अर्धापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कामठा (बु.) ते नांदेड रस्त्यावर सापडलेल्या एका बॅगेत रोख सत्तर हजार रुपयासह सोन्याचे दागिने असा एकूण १५ लाख रुपये किंमतीचा ऐवज कामठा (बु.) येथील सामाजिक कार्यकर्ते शंकरराव कंगारे यांनी परत करुन आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या या प्रामाणिकतेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कामठा (बु.) येथील रहिवाशी तथा पत्रकार शंकरराव गंगारामजी कंगारे हे दि. ०६ एप्रिल रोजी सोमवारी नांदेडला जात असताना शेख नदीम शेख अकिम राहणार गाडीपुरा बडी दर्गा, नांदेड हे औंढा येथून नांदेड कडे आपल्या कुटुंबासह मोटार सायकलवरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या जवळील एक कॅरीबॅग पासदगाव जवळ खाली पडली. ती कॅरीबॅग नांदेडकडे जाणा-या शंकरराव कंगारे यांना सापडली. परंतु ती बॅग आहे ? कोणास द्यावी ? याचा पत्ता लागत नसल्यामूळे त्यांनी ती बॅग आपल्याकडेच सुरक्षित ठेवून चौकशी सुरू केली. शेवटी चौकशी अंती ती बॅग शेख नदीम शेख अकीम यांची असल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीची ओळख परेड करुन शंकरराव कंगारे यांनी सापडलेली जशीच्या तशी ती बॅग शेख नदीम यांना दिली.

