नवी दिल्ली : आजपासून डाळींच्या साठ्याच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ज्या माध्यमातून डाळींचे आयातदार आणि व्यापा-यांना दर आठवड्याला आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्यांसह डाळींचा साठा अचूकपणे घोषित करावा लागणार आहे. यासाठी पोर्टलच्या माध्यमातून ही नोंद ठेवली जाणार आहे.
सद्यस्थितीत डाळींचे भाव वधारले असून डाळींचा अचूक साठा असावा यासाठी ही देखरेख सुरु करण्यात आली आहे. याबाबत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी आणि आयात-संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी डाळी उद्योगातील भागधारकांसोबत अनेक बैठका घेतल्या. याच बैठकांदरम्यान, विविध बाजारातील व्यापा-यांकडे असलेल्या साठ्याच्या ठ्याच्या स्थितीबाबत मार्केट इंटेलिजन्स स्त्रोतांकडून मिळालेल्या इनपुटवरही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर डाळींचा फॉरवर्ड ट्रेड म्हणजे वायदा व्यापार करणा-यांवर अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यान्तर्गत कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या बैठकीत म्यानमारमधून डाळींच्या आयातीबाबतही चर्चा झाली. यानुसार म्यानमारमधील सुधारित विनिमय दर आणि तेथील आयातदारांनी केलेली साठेबाजी या पार्श्वभूमीवर, म्यानमारमधून होणा-या डाळींच्या आयातीसंबंधीच्या अडचणी उदा. आयात किंमती इ. अशा अडचणींविषयी त्यांनी यांगूनमधील भारतीय मिशनशी चर्चा केली. २५ जानेवारीपासून रुपयात विनिमय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती भारतीय मिशनने दिली. व्यापार आणि व्यवहार सोपे आणि अधिक कार्यक्षम करण्याचा उद्देश त्यामागे आहे.
ही नवी यंत्रणा सागरी व्यापार आणि सीमापार व्यापार दोन्हींसाठी आणि वस्तू व सेवा दोन्हींतील व्यापारासाठी लागू असेल. व्यापा-यांनी ही यंत्रणा स्वीकारल्यास चलनाच्या रुपान्तरणावरील खर्च कमी होईल आणि विनिमय दराशी संबंधित गुंतागुंती दूर होतील. कारण मुळात, विविध चलनांच्या रुपान्तरणांचीच गरज पडणार नाही. व्यापारी समुदायांमध्ये विशेषत: डाळ आयातदारांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केल्याबद्दलची माहिती वितरित करण्यासाठी वेगळे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून एसआरव्हीएद्वारे रुपयात थेट भरणा व्यवस्था वापरण्याची विनंती त्यांना करण्यात येत आहे. आयातदार आणि या उद्योगातील अन्य हितधारक जसे की गिरणीमालक, साठेदार, किरकोळ व्यापारी इत्यादींनी त्यांच्याकडील डाळींचे आयात केलेल्या पिवळ्या वाटाण्यासह साठे प्रामाणिकपणे घोषित करावेत अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.