मुंबई : आरबीआयने कारवाई केल्यानंतर अडचणीत आलेल्या पेटीएम बँकेचे चेअरमन विजय शेखर शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळाची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. वन ९७ कम्युनिकेशन लि.ने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळातून आपल्या नामनिर्देशित व्यक्तीला माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर विजय शेखर शर्मा यांनीदेखील बोर्ड सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. स्टॉक एक्स्चेंजला पाठवण्यात आलेल्या निवेदनात पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेने बोर्डाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, सेवानिवृत्त आयएएस देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि सेवानिवृत्त आयएसएस रजनी सेखरी सिब्बल यांचा बोर्डात समावेश करण्यात आला आहे.