मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी दुपारी महाराष्ट्रातील नंदूरबारमध्ये प्रवेश करणार आहे. धुळे-मालेगाव, नाशिक, पालघर, ठाणे असा प्रवास करीत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार असून १७ मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होईल. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणा-या जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार कि. मी.ची पदयात्रा काढली होती. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुस-या टप्प्यात १५ जानेवारीला मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात करण्यात आली. या यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघांतून ६७०० कि. मी.चा प्रवास करीत ही यात्रा मंगळवारी दुपारी महाराष्ट्रातील नंदूरबारमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे-मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करीत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १७ तारखेला शिवाजी पार्क येथे मोठी जाहीर सभा होणार आहे. प्रदेश काँग्रेसने याची जय्यत तयारी केली आहे.