नागपूर : प्रतिनिधी
नागपुरातून अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील काटोल येथे पहाटे भीषण स्फोट झाला असून या स्फोटात तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटके तयार करणा-या एसबीएल या कंपनीत हा भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर भीषण आग लागली होती आणि सध्या परिसरात बचावकार्य सुरू आहे.
या कंपनीत विविध प्रकारची स्फोटके तयार केली जातात. स्फोटके तयार करत असतानाच हा भीषण स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आजूबाजूच्या गावांतील कामगार या ठिकाणी काम करत असताना स्फोट झाल्याने परिसरात मोठ्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
स्फोट झाला त्या वेळी अंदाजे २५ ते ३० कामगार कारखान्यात काम करत होते. स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे आणि कोसळलेल्या ढिगा-याखाली काही कामगार अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत १५ जखमी कामगारांना सुरक्षित बाहेर काढून नागपूरमधील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे.
मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहे.
फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे दरम्यान, संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

