लातूर : प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तसेच जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कृतीला मनाई करण्यात आली आहे.
हे आदेश १० मेपर्यंत अंमलात राहतील. प्रत्येक व्यक्त्तीला हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात कसल्याही प्रकारचे जात, भार्षा, धार्मिक शिबिरांचे, मेळाव्यांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केले आहेत. लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये आदेश लागु केले आहेत.