छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिल्याचे प्रकरण समोर आल्याने मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. विशेष म्हणजे यावेळी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर खुद्द अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया आली असून, सत्तार यांनी ‘कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो’ असे म्हटले आहेत.
दरम्यान यावर बोलतांना सत्तार म्हणाले की, ‘बुधवारी संध्याकाळी सिल्लोड शहरामध्ये गौतमी पाटील यांच्या लावणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ६० ते ६५ हजार लोकांची उपस्थिती होती. अशावेळी विरोधी पक्षातील लोकांनी काही हुल्लडबाज लोकांना पाठवून कार्यक्रम अयशस्वी व्हावा आणि कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्यासाठी पाठवले होते. तसेच हा कार्यक्रम उधळून लावण्याचा काही लोकांचा कट होता. अशा लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातील बोलीत, शब्दात मी बोललो. यामुळे कुणाच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाली असेल तर, निश्चितपणे मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असे सत्तार म्हणाले आहेत.
मी काही शब्दांचा वापर केला.
पुढे बोलतांना सत्तार म्हणाले की, ‘कार्यक्रमाच्या ठिकाणी २० हजार महिला होत्या. लहान मुलं होते. एकूण ६० ते ६५ हजार लोकांची गर्दी होती. त्यामुळे अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील लोकांनी जी काही हुल्लडबाजी केली, ती यापुढे भविष्यात करू नयेत अशी माझी विनंती आहे. कारण आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम संपूर्ण सिल्लोड शहराचा होता. कार्यक्रमासाठी आलेल्या महिला, मुलं सुरक्षित घरी जावेत आणि कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मी काही शब्दांचा वापर केला. मात्र, परिस्थिती तशी असल्याने मला ते बोलावे लागले. यामुळे ‘कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो’ असेही सत्तार म्हणाले.

