30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरखरीप हंगामात ६ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

खरीप हंगामात ६ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांना विविध पिकांच्या पेरणीची योग्य वेळ आणि पद्धत, त्या पिकांवर येणारे रोग आणि त्याअनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी गुरुवारी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यंदा खरीप हंगामात ६ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, कृषी विद्यावेत्ता अरुण गुट्टे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिग्रसे सचिन, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रमोद  शिंदे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. आर. शेलार, कृषि विकास अधिकारी एस. आर. चोले, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व सर्व तालुका कृषि अधिकारी यावेळी उपस्थिती होते.
शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ येवू नये, यासाठी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी होणे आवश्यक आहे. याविषयी कृषी विभागाने शेतक-यांमध्ये जनजागृती करावी. तसेच पीक पेरणीची योग्य पद्धत, बियाणांची निवड आणि पेरणीपूर्व प्रक्रिया, पेरणीचा योग्य कालावधी आदी बाबींची माहिती शेतक-यांना देण्यात यावी. जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खते यांची विक्री होवू नये, यासाठी पथके स्थापन करुन आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पेरणीच्या प्रस्तावित क्षेत्राच्या प्रमाणात बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
सोयबीनवर शंखी गोगलगाय, पिवळा मोझॅक आणि तूर पिकावर मर रोग येत असल्याचे गेल्या काही हंगामात दिसून आले आहे. या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी शेतक-यांनी काय करावे आणि काय करु नये, याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. कृषी विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक शेतक-यांपर्यंत पोहचूनत्यांना आवश्यक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करावे. जीआय मानांकन मिळालेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख ५९ हजार ७०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीन ४ लाख ९० हजार हेक्टर, तूर ७५ हजार हेक्टरवर आणि खरीप ज्वारी १० हजार हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. याकरिता आवश्यक खते, बियाणे यांचे नियोजन करण्यात आले आहे. २० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ७७ हजार ३५३ मे. टन रासायनिक खते उपलब्ध झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी सांगितले.
खरीप हंगामात सोयाबीन, तूर पिकांवर येणा-या विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि विभागामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. याकरिता तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकांचे प्रकाशन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. लातूर जिल्हामध्ये सोयाबीन हे प्रमुख पिक असून सलग सोयाबीन न घेता सोयाबीन, तूर आंतरपीक तसेच तूर पिकाच्या सुधारित वाणाचा वापर करणे, शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे, रुंद सारी वरंबा पद्धती, टोकन पद्धतीचा अवलंब करण्याबाबतचे नियोजन बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. कृषी उपसंचालक महेश क्षीरसागर यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR