मुंबई : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा १० धावांनी पराभव करत दोन गुणांची कमाई केली. दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने नऊ विकेटच्या मोबदल्यात २४७ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून तिलक वर्मानं एकाकी झुंज दिली. तिलक वर्माने शानदार अर्धशतक ठोकले. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन सारखे दिग्गज फेल ठरले. दिल्लीकडून रसिख सलाम याने भेदक मारा करत मुंबईच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले.
दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. मुंबईला ६ षटकात फक्त ६५ धावा करता आल्या, पण तीन फलंदाजाना गमावले होते. माजी कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात तंबूत परतला. रोहित शर्माला फक्त ८ धावा काढता आल्या. ईशान किशन याने १४ चेंडूमध्ये २० धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता. तर सूर्यकुमार याद याने १३ चेंडूमध्ये २६ धावा काढल्या. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. दोन्ही संघामध्ये पॉवरप्लेचा फरक स्पष्ट दिसला. दिल्लीने पहिल्या सहा षटकामध्ये ९२ धावा केल्या होत्या, तर मुंबईला ६५ धावाच करता आल्या. मधल्या फळीतील नेहाल वढेरा यालाही मोठी खेळी करता आली नाही. वढेरानं दोन चेंडूत फक्त चार धावा केल्या. मोहम्मद नबीने ४ चेंडूमध्ये सात धावांची खेळी केली. यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने झंझावती फलंदाजी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. हार्दिक पांड्याने फक्त २४ चेंडूमध्ये ४६ धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. हार्दिक पांड्याने मुंबईच्या धावगतीला वेग दिला. हार्दिकने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समचार घेतला. पण जम बसलेल्या हार्दिक पांड्याने विकेट फेकली. टीम डेविड यानेही ३७ धावांची खेळी करत झुंज दिली. पण अखेरपर्यंत तो थांबू शकला नाही. टीम डेविड याने १७ चेंडूमध्ये तीन षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने ३७ धावा जोडल्या. टीम डेविड याने २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
रोहित शर्मा, सूर्यासारखे दिग्गज फलंदाज तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने एकाकी झुंज दिली. तिलक वर्माने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पण तिलक वर्मा मुंबईला विजय मिळवून देता आला नाही. तिलक वर्माने ३२ चेंडूमध्ये ६३ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने चार चौकार आणि चार षटकार ठोकले. तिलक वर्माने महत्वाच्या दोन भागिदारी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी ३९ चेंडूमध्ये ७१ धावांची भागिदारी केली. तर टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी २९ चेंडूत ७० धावा जोडल्या.