नांदेड : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस तथा महाविकास आघाडी पाच तर दुस-या टप्प्यात नांदेडसह अन्य ठिकाणच्या जागा जिंकू असा दावा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर नांदेडमधून काँगे्रससोबत बेईमानी झाली, अशी टिका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली.
काँग्रेस पक्ष कार्यालय नवा मोंढा येथे मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लोकसभा उमेदवार वंसतराव चव्हाण, आ. मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष हणमंत बेटमोगरेकर, अनिल मोरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले, नांदेडमधून काँगे्रसला धोका झाला, अनेक मोठी पदे उपभोगुन अशोक चव्हाण यांनी पक्षाशी बेइमानी केली. मात्र ते भाजपात गेल्याने फरक पडला नाही, कॉंग्रेसला चाहणारा वर्ग जिल्ह्यात आजही कायम आहे. अशोक चव्हाण यांच्यामुळे अनेकांनी पक्ष सोडला, त्यांनी आत्मपरीक्षण करावे.
मुख्यमंत्री असलेला नेता बांधकाम मंत्री होऊन हाताखाली काम करतो. नांदेडातील पुर्णा रोड १२० वरुन २०० कोटीवर गेला, याच्या मागे कोण आहे याचे उत्तर लोकांना द्यावे. स्वत: च्या स्वार्थासाठी आदर्श घोटाळा ते थेट राज्यसभेची जागा मिळवली, यामुळे चव्हाण सेटिंगबाज माणूस आहे, अशी टिका केली. पुढे ते म्हणाले काही सुपारी घेऊन फिरतात, आता नांदेडात कॉंग्रेस स्वतंत्र झाली असून आ.जवळगाकर,आ.हंबर्डे आमच्या सोबत आहेत, असे सांगीतले. नांदेड ही संताची भूमी असून लोकशाही टिकविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. तर वंचित आघाडीबाबत बोलतांना पटोले म्हणाले, अकोला येथे वंचित प्रभाव नाही, यामुळे पाठिंबा दिला नाही.