सांगली : जिल्ह्यात एकास एक लढत झाल्यास भाजपचा पराभव शक्य आहे. ‘सांगली’बाबतचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याने आता कोणी वेगळी भूमिका घेऊ नये, सांगलीत योग्य लढत व्हावी, यासाठी मी पुढाकार घेतला होता, तरीही काहीजण सोशल मीडियाद्वारे माझ्याबद्दल अपप्रचार करीत आहेत.
महाविकास आघाडीचा सांगलीचा उमेदवार वरिष्ठ पातळीवरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केला आहे, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
आता एकसंधपणे आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे. जुना इतिहासातील वाद नको, भविष्याचा विचार करा. ही निवडणूक म्हणजे शेवटची नाही, असा टोलाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांचे नाव न घेता येथे लगावला.
जयंत पाटील म्हणाले, राज्यात १० जागा घेऊन आघाडी राहावी, ही भूमिका घेतली आहे. ‘सांगली’ची जागा मागितली नाही. संयुक्त पत्रकार परिषद होऊन निर्णय झाला आहे. भाजपसमोर एकच उमेदवार द्यायचा प्रयत्न आहे. एकास एक उमेदवार झाल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो. सांगलीलादेखील असंच व्हायला पाहिजे, असे आमचे मत आहे. ‘सांगली’ची जागा शिवसेनेने मागितली होती. ते म्हणाले, कोल्हापूरबाबत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. ‘सांगली’च्या निर्णयाबद्दल मी बोलणं योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, सांगलीच्या बाबतीत मी त्या-त्या वेळी सगळं सांगितलं आहे. सगळ्यांनी एकसंधपणा दाखवला पाहिजे. मतांची विभागणी होऊ नये, असे आमचे मत आहे. मी विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी बोलणार आहे.’’