औसा/भेटा : प्रतिनिधी
सलग तिस-या दिवशी औसा तालुक्यात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला असून गेल्या दोन दिवसांत जनावरे मरण पावली तर शनिवारी झालेल्या पावसाने वडजी येथील एक महिला वीज पडून मृत्यूमुखी पडली आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने चार जनावरे दगावली आहेत. शनिवारी तालुक्यातील भेटा परिसरात अवकाळी विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. वडजी येथे दि १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वैशाली तानाजी मुळे वय ३५ यांचा मृत्यू झाला. सदर महिला शेतामध्ये पाऊस पडत असतानाचिंंचेच्या झाडाखाली थांबली होती. तिच्यावर वीज पडून मरण पावली.
मयत महिलेस दोन मुले असून ओम तानाजी मुळे (वय १५) तसेच दुसरा मुलगा शुभम तानाजी मुळे (वय १३) अशी त्यांची नावे आहेत. वडजी येथे मयत महिलेचे सासरे बाबू गुंडा मुळे यांच्या नावावर ०.७० आर इतकी जमीन आहे. तसेच मयत महिला ही शेतकरी कुंटुबातील असून वडजी गावामध्ये मृत्यूच्या घटनेमुळे नागरिकांतून हळ-हळ व्यक्त केली जात आहे. वडजीचे तलाठी वाय. जे. मिश्रा यांनी तहसिलदार यांच्याकडे अहवाल पाठवला आहे. भेटा परिसरात भेटासह आंदोरा, वडजी, बोरगाव, कवठा, भादा, नाहोली या गावांमध्ये विजेच्या कडकडासह गारांचा, वादळी वा-यासह पाऊस होऊन फळबाग, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.