लातूर : प्रतिनिधी
मौजे टाका, ता. औसा येथे शेतीच्या वाटणीवरून जवळच्या नातेवाईकांनीच धारदार शस्त्राने डोक्यावर, पाटीवर, मानेवर वार करून खून केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी भादा पोलिसांत चौघा जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मौजे टाका, ता. औसा येथे सदानंद भास्कर शिंदे व इतर चौघा जणांमध्ये वाद चालू होता. या दरम्यान सदानंद शिंदे यांचे वडील भास्कर दगडू उर्फ भैरू शिंदे हे मध्ये आले असता इतर चौघा जणांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यापैकी एकाने भास्कर शिंदे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीररित्या जखमी होऊन त्यात मरण पावले. या प्रकरणी संतोष दगडू उर्फ भैरू शिंदे, रमाकांत दगडू उर्फ भैरू शिंदे दोघे रा. टाका, ता. औसा व सोन्या मोरे, विजया मोरे दोघे रा. बार्शी रोड लातूर यांच्या विरोधात भादा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.