नवी दिल्ली : अरबी समुद्रात भारतीय हद्दीतील एका व्यापारी जहाजाला बंदी बनवलेल्या सोमालियाच्या ३५ समुद्री चाच्यांना भारतीय नौदलाने कोंडीत पकडले होते. तसेच त्यांना समर्पण करण्यासाठी भाग पाडले. या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज नौदलाने त्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली केले.
१६ मार्च रोजी नौदलाने हे अँटी पायरसी ऑपरेशन केले होते. नौदलाच्या ‘आयएनएस’ कोलकाताने या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतले होते. या सर्व चाच्यांना मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये आणण्यात आले आहे. याच ठिकाणी त्यांचा ताबा मुंबई पोलिसांकडे देण्यात आला.
भारतीय नौदलाने भारतीय समुद्र किना-यापासून १४०० नॉटिकल माईलवर असलेल्या एका व्यापारी जहाजावर कब्जा करणा-या ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना आत्मसमर्पणाशिवाय कुठलाही पर्याय ठेवला नव्हता. त्यानंतर नौदलाच्या जवानांनी या जहाजावरील १७ चालक दलाच्या सदस्यांची सुखरुप सुटका केली होती.
नौदलाने आपल्या पी-८१ कोस्टगार्ड विमान, फ्रन्टलाईन जहाज, आयएनएस कोलकाता आणि आयएनएस सुभद्रा आणि मानवरहित विमान तैनात केले होते. या मोहिमेसाठी सी-१७ विमानातून खास मार्कोस कमांडोंना जहाजावर उतरवण्यात आले होते.