जिंतूर : येथील श्री संचारेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संस्कार केंद्रातील इयत्ता २ री ते ७ वी एकूण ४२ विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे कौतूक केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद खेर्डेकर तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, पोलीस उपनिरीक्षक जगदीश म्हेत्रे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, अमित शिराळकर, तलाठी पठाण, मयूर जोशी, वसंतराव पुराणिक, चंद्रकांत वसेकर, मीरा खापरखुंटीकर, संगिता जिंतूरकर, श्रुती खेर्डेकर, सुरेश अन्नदाते उपस्थित होते. मान्यवरांच्या स्वागतासाठी ७ वीतील विद्यार्थीनी धनश्री सोळंके व आर्या हजारे यांनी विज्ञानावर आधारित विज्ञान गीत सादर केले. प्रास्ताविक किरण नाईक यांनी केले. त्यानंतर ७ वी तील समर्थ सोमोसे याने भारतरत्न शास्ञज्ञ सी. व्ही. रमण तर अक्षरा गीते हिने माजी राष्ट्रपती तथा महान शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या शोधकार्य व विज्ञान क्षेत्रातील भारतासाठी योगदान याबद्दल माहिती सांगितली. या प्रसंगी मराठी राजभाषा दिना निमित्त घेतलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी पोले यांनी प्रत्येक लहान मूल कोणतीही गोष्ट कुतूहलाने पाहत असते. प्रत्येक मूल हे निरीक्षणातून भरपूर काही शिकत असते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे यांनी छोट्या कथेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्यामध्ये जर एखादी कमतरता असेल तर त्या कमतरतेवर आपण मात करत पुढे कसं जावे हा संदेश कथेतून दिला. कधीही कुणाला कमी लेखू नये, आपला आत्मविश्वास कायम ठेवावा, असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक सुरेश अन्नदाते यांनी केला. आभार प्रदर्शन संजय गायकवाड तर सूत्रसंचलन रूपाली सोनसळे यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्कार केंद्रातील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.