चिपळूण : उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार ठाकरे गटाचे कोकणातले दिग्गज नेते भास्कर जाधव पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत झालेल्या राड्यानंतर भास्कर जाधव यांनी पक्षाने दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली होती. आज भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.
मी केवळ माझी निवडणूक बघत नाही. माझ्या निवडणुकीची काळजी कमी करतो. माझ्या सहका-यांची निवडणूक बघण्यासाठी मी मदत करतो. केवळ जिल्हा परिषद, पंचायत समिती नाही तर ग्रामपंचायतीसाठीही मी पालकमंत्री असतानाही प्रचारासाठी गेलो. निवडणूक कोणती हे महत्त्वाचं नाही. माझा सहकारी होता म्हणून मी गेलो. मी माझ्या सहका-यांशी कायम पाठीशी राहिलो.., असे भास्कर जाधव म्हणाले.
ज्या ज्या वेळेला संघर्षाची वेळ येते तेव्हा भास्कर जाधव स्वत: उभा असतो. त्याचंच चित्र परवा तुम्ही सर्वांनी पाहिलं. एवढं सगळं झाल्यानंतर आजचा मेळावा कशासाठी.. माझ्या चाळीस वर्षांच्या राजकारणामध्ये मी विरोधकांवर व्यक्तिगत टीका, अपशब्द वापरले नाहीत, असे भास्कर जाधव म्हणाले. तसेच काही घरभेद्यांनी संभ्रम निर्माण केला आहे; अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.
ठाकरेंना इशारा..
यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी पोलिस स्टेशनमध्ये काय झालं? याद्या घेऊन कोण जात होतं? असा सवाल उपस्थित केला. तसेच आमच्या गोट्या मोरे या कार्यकर्त्याच्या बहिणीचे लग्न होते. मात्र त्याला जामीन मिळाला नाही. हे सर्व कोण सांगत होतं? तो पक्षीय संघर्ष होता, माझा व्यक्तिगत नव्हता. असे म्हणत पोलिस फक्त नावालाच राहिले, त्यांनी पदाला काळिमा फासला, अशा शब्दांत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
तसेच आज भूमिका स्पष्ट करतो. मी पक्ष सोडणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरेंना दिला आहे. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, आपल्याला बदला घ्यायचा आहे. पुन्हा सत्ता आणायची आहे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.