नवी दिल्ली : केंद्र सरकारने १४ जून २०२२ मध्ये ‘अग्निवीर’ योजना आणली. या योजने अंतर्गत देशातील तरुणांना ४ वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाते. पण, या योजनेला विरोधी पक्षांसह देशातील तरुणांनी जोरदार विरोध केला. आता संरक्षण मंत्री राजनाथ स्ािंह यांनी या अग्निवीर योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गरज भासल्यास सरकार अग्निवीर योजनेत बदल करण्यास तयार आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
‘टाईम्स नाऊ’च्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण दलात तरुणांची गरज आहे. तरुण अधिक उत्साही असतात, ते तंत्रज्ञानाचे अधिक जाणकार आहेत. त्यांचे भविष्य सुरक्षित राहील, याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. गरज भासल्यास आम्ही या योजनेत बदल करण्यास तयार आहोत.
मोदी सरकारने १४ जून २०२२ रोजी भारतीय सैन्यात तरुणांना भरती करण्यासाठी अग्नीवीर योजना सुरू केली. या योजने अंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना सैन्यात सेवा देता येते. या अग्निवीरांना निवृत्तीनंतर इतर माजी सैनिकांप्रमाणे पेन्शन, ग्रॅच्युईटी, आरोग्य योजना, माजी सैनिकाचा दर्जा मिळणार नाही. मात्र, निवृत्तीनंतर इतर ठिकाणच्या नोकरभरतीत त्यांना प्राधान्य दिले जाईल. ही योजना सुरू झाल्यापासून सातत्याने विरोधक यावर टीका करत आहेत.