मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी रविवारी सकाळी गोळीबार केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून चर्चा केली. शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानची सुरक्षा वाढवण्याची सूचना केली आहे.
वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर आज पहाटे ५ वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ५ वेळा फायरिंग करून पळ काढला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून गोळीबार करणा-यांचा शोध सुरू केला आहे.
लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असला तरी त्याची टोळी बाहेर असून गोल्डी ब्रारही बाहेर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत याच टोळीने अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.