नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केली आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षातून आणि राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपमध्ये अनेक मोठ्या नेत्यामध्ये असंतोष पसरल्याची चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे. तर आज माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांही राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भाजपने त्यांचे लोकसभेचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काल सकाळीच दिल्ली पूर्वचे खासदार गौतम गंभीर आणि हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांनी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. तर रात्री पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करून केंदीय विदेश राज्य मंत्री मिनाक्षी लेखी, रामेश्वरम तेली,जॉन बारला आणि डॉ हर्ष वर्धन यांचा पत्ता कट केला आहे. यामुळे भाजपचे अनेक नेते आता पक्षाला रामराम ठोकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
डॉक्टर हर्षवर्धन यांनी रविवारी सोशल मीडिया वर पोस्ट करून निवृत्तीची माहिती दिली. डॉ. हर्षवर्धन यांनी तीस वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपसाठी काम केले याकाळात त्यांनी पाचवेळा विधानसभा आणि दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवल्या आणि त्या सर्व मोठ्या फरकाने जिंकल्या. याशिवाय त्यांनी पक्ष संघटना आणि केंद्र सरकारमध्ये अनेक पदे भूषवली. आता माझी कृष्णा नगर येथील ईएनटी क्लिनिक माज्या परतीची वाट पाहत आहे, असे सांगत हर्ष वर्धन यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.