मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली, रामटेक, भिवंडी यासारख्या जागांवरुन तणाव होता. सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. कॉँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी ठाकरे गटाच्या विरूद्ध उमेदवार उभे करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. एकुणात आता महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढती होणार हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या जागा काँग्रेसला सोडण्यास आघाडीतील मित्रपक्षांनी नकार दिला, तर इंडिया आघाडीतील घटकपक्षांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसला हायकमांडने हिरवा कंदील दाखवला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु मित्रपक्षांना जागा सोडून आघाडीची किंमत मोजण्यास ते तयार नाहीत. लोकसभेच्या अशा वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध लढले, तर मतविभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल, अशी च्ािंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेते यावर तोडगा काढून सुवर्णमध्य साधणार का, किंवा ठाकरे गटाने जाहीर केलेल्या सांगली, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा काँग्रेसला सोडल्या जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगलीत प्रतिष्ठा पणाला…
सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस-ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसकडून विशाल पाटील लोकसभा लढवण्यास उत्सुक होते. विश्वजीत कदम त्यांच्यासाठी फील्ंिडग करताना पाहायला मिळाले. मात्र ठाकरेंनी पैलवान चंद्रहार पाटील यांना पक्षप्रवेश देत त्यांना थेट सांगलीतून तिकीट जाहीर केले. तेव्हापासूनच काँग्रेसजन नाराज होते. ठाकरेंनी युतीधर्माचं पालन न केल्याचा आरोप त्यांनी केला.
विशेष म्हणजे, कोल्हापूर आणि रामटेक या दोन मतदारसंघांत शिवसेनेचे विद्यमान खासदार असूनही (दोन्ही खासदार श्ािंदे गटात) जागा काँग्रेसला सोडण्यात आल्या होत्या. तर युतीत परंपरेने लढवत आलेली अमरावतीची जागाही शिवसेनेने काँग्रेसला सोडली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीची जागा लढवण्याचा आग्रह ठाकरे गटाने धरला होता. महत्त्वाचं म्हणजे उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य या मुंबईतील दोन्ही जागांवरही शिवसेनेचे विद्यमान खासदार असतानाही (दोन्ही खासदार श्ािंदे गटात) काँग्रेसने त्या जागांचाही हट्ट धरला होता. परंतु तिथे ठाकरेंनी उमेदवार दिले.