नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली असून, केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. यामुळे केजरीवाल यांच्या अटकेवर संपूर्ण विरोधकांनी नाराजी व्यक्त केली असून, अटकेच्या विरोधात रविवारी ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता इंडिया आघाडी दिल्लीच्या रामलीला मैदानावर महारॅली काढणार आहे. या रॅलीला देशभरातील इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दिल्ली सरकारचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय म्हणाले की, केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्ली आणि देशात निदर्शने सुरू आहेत. आणि आगामी काळातही निदर्शने सुरूच राहणार आहेत. गोपाल राय म्हणाले की झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या अंडिया आघाडीच्या नेत्यांवर देशाच्या विविध भागात तपास यंत्रणेकडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. संपूर्ण विरोधकांना संपवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचे गोपाल राय म्हणाले. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावले जात आहे. जेणेकरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असेही राय म्हणाले.
लोकशाही वाचवण्यासाठी काढणार रॅली
दरम्यान, भाजपवर निशाणा साधत काँग्रेस नेते अरविंदर सिंग लवली म्हणाले की, आज ज्या प्रकारे राजकीय वातावरण गढुळ झाले आहे. महात्मा गांधी आणि भगतसिंग यांनी अशा वातावरणाची कधीही कल्पनाही केली नसेलख असे लवली म्हणाले. लोकसभा निवडणूकीपूर्वी देशातील सर्वात जुन्या पक्षाची बँक खाती गोठवली आहेत, निवडणुकीपूर्वी निवडून आलेला मुख्यमंत्र्याला खोट्या गुन्ह्यात अटक केली जाते याला लोकशाही कसे म्हणता येईल. सत्तेच्या लालशेपोटी मोदी सरकारने देशातील सर्व संस्था वेठीत धरल्या असून, ही अघोषीत आणीबानी आहे. यामुळे भारताची लोकशाही वाचवण्यासाठी ३१ मार्च रोजी रामलीला मैदानावर इंडिया अलायन्सची भव्य सभा होणार आहे असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.