Homeराष्ट्रीयइराणच्या IRGC कडून होर्मुजच्या सामुद्रधुनीत भारताकडे येणारे जहाज जप्त; गोळीबारानंतर तणाव वाढला

इराणच्या IRGC कडून होर्मुजच्या सामुद्रधुनीत भारताकडे येणारे जहाज जप्त; गोळीबारानंतर तणाव वाढला

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) बुधवारी होर्मुजच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांना लक्ष्य केले. यामध्ये भारताकडे येणाऱ्या एका मोठ्या मालवाहू जहाजाचा समावेश असून, इराणने हे जहाज आपल्या ताब्यात घेऊन इराणी किनारपट्टीकडे नेले आहे.

लक्ष्य केलेली जहाजे: इराणने ‘Epaminondas’ आणि ‘MSC Francesca’ या दोन जहाजांना ताब्यात घेतले आहे. यातील ‘Epaminondas’ हे जहाज दुबईच्या जेबेल अली बंदरातून गुजरातच्या दिशेने येत होते. इराणच्या अधिकृत माध्यमांनुसार, या जहाजांनी सागरी नियमांचे उल्लंघन केले आणि नेव्हिगेशन यंत्रणेशी छेडछाड करून सागरी सुरक्षेला धोका निर्माण केला, असा आरोप IRGC ने केला आहे.

‘युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स’ (UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, ओमानच्या ईशान्येस साधारण १५ नॉटिकल मैलावर एका जहाजावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये जहाजाच्या ‘ब्रिज’ भागाचे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेले जहाज गुजरातकडे येत असल्याने भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर आणि सागरी व्यापारावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी १८ एप्रिल रोजी देखील भारताकडे येणाऱ्या १४ जहाजांचा ताफा इराणने रोखला होता, ज्यामध्ये गोळीबारामुळे एका जहाजाचे नुकसान झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR