नवी दिल्ली : खेलो इंडिया स्पर्धांमध्ये पदक विजेते सरकारी नोक-यांसाठी पात्र ठरतील, नव्या धोरणानुसार हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम क्रीडा इकोसिस्टम आणि तळागाळातील क्रीडा प्रतिभेचे पालनपोषण करण्याच्या दूरदृष्टीच्या धोरणानुसार आणि खेळाडूंना करियरचा मार्ग खुला करण्याच्या विचारांनुसार सरकारी नोक-यांचा हा पर्याय तयार करण्यात आल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवणा-या खेळाडूंसाठी सरकारी नोक-या देण्यात येत होत्याच आता आम्ही खेलो इंडिया, युवा विद्यापीठ स्पर्धा, पॅरा आणि हिवाळी स्पर्धांतील विजेत्यांसाठीही नोक-यांचा मार्ग तयार केला आहे, असे ठाकूर यांनी ‘एक्स’ या सोशल मिडीयावर म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे भारत क्रिडा क्षेत्रात सुपर पॉवर होईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
तळागाळामध्ये क्रीडा संस्कृती जागवण्यासाठी आणि तरुण खेळाडूंना स्फूर्ती देत स्पर्धांचे नवे दालन उभे करण्यासाठी २०१८ मध्ये खेलो इंडिया हा उपक्रम मोदी सरकारने सुरु केला. या स्पर्धांना आता भरभरून पाठींबा मिळत आहे. देशातील गुणवत्ता प्रकर्षाने पुढे येत आहे, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.