सतीश टोणगे: कळंब
धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने कंबर कसली असून, माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी या जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्याला बळ द्यायला सुरुवात केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील हे भाजपवासी झाले आहेत. तर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून ते भाजप मार्गावर असल्याची कुजबुज चालू आहे, त्यांचे पुत्र सुनील चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने, ‘पुत्रप्रेमापोटी साहेब… पण जातील’ याबाबत संशय व्यक्त करत आहेत. पक्षाने चव्हाण व पाटील यांना अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही त्यांनी पक्षाला दगा दिला आहे.
बसवराज पाटील यांच्यामुळे भाजपकडे लिंगायत समाज येईल अशी आशा भाजपला वाटू लागली आहे, पाटील यांनी समाजाला वेळ दिला नसल्याने आम्ही त्यांच्या सोबत नसल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. चव्हाण साहेब व त्यांच्या मुलाने असे करायला नको होते…चव्हाण साहेब व पाटील साहेब यांच्याकडून काँग्रेस पक्षाच्या व कार्यकर्त्यांच्या खूप अपेक्षा होत्या. त्यांनी त्या धुळीस मिळवल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ते उघड्यावर पडत असल्याचे लक्षात आल्यावर लातूरकर धावून आले असून, त्यांनी कार्यकर्त्याला आधार देऊन, बळ देत आहेत. आमदार अमितभैय्या देशमुख यांच्यामुळे आम्ही चार्ज झाल्याचे सांगत असून जुन्या कार्यकर्त्यांना प्रवाहात आणण्यासाठी अमित देशमुख यांनी पावले उचलली आहेत. येणा-या काळात हा पक्ष नक्कीच उभारी घेईल यात शंका नाही. चव्हाण साहेब व पाटील साहेब, तुम्ही असे करायला नको होते….असे सोशल मीडियावर टाकून ट्रोल केले जात आहे. अनेक वर्षे मंत्री, आमदार राहिलेले मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील यांनी या जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न का केला नाही? धाराशिव हा लातूरचा मोठा भाऊ असूनही त्याचा विकास का झाला नाही? अशी कुजबुज कार्यकर्त्यांमधून होत आहे.