मुंबई : प्रतिनिधी
गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. जे मांडलिक, गुलाम असतात, जे आश्रित असतात त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. आमचं जागावाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो.
कधी ‘मातोश्री’ तर कधी ‘सिल्व्हर ओक’ नाहीतर अन्य ठिकाणी बसतो. आम्हाला ऊठसूठ दिल्लीत जाऊन रुमाल टाकून बसावं लागत नाही, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केला आहे.
भाजपा माणसं गळालाच लावते. स्वत:हून मिळवत नाहीत. मग माणसं गाळत जातात. महादेव जानकर यांच्याबाबत बोलणार नाही. तो त्यांचा निर्णय आहे. बारामतीत सुप्रिया सुळे या विक्रमी मतांनी जिंकून येतील, याबाबत आमच्या मनात शंका नाही. आम्ही तिन्ही पक्ष तिथे कामाला लागलो आहोत. मी स्वत: बारामती मतदारसंघात तीन सभा केल्या आहेत. वेळ पडली तर उद्धव ठाकरे स्वत: बारामतीत सभा घेतील.
कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. बारामतीत कोणीही येऊ द्या, सुप्रिया सुळे या प्रचंड मतांनी जिंकून येतील. तिथे लढायला कोणी तयार नाही. त्यामुळे असे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला गळाला लावा त्याला गळाला लावा आणि गळ्यात घाला, अशी टीका राऊतांनी यावेळी केली.