नवी दिल्ली : आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दिल्लीत बैठकनंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत मुंबईत ताज लँड्स हॉटेलमध्ये चर्चा यासोबत राज ठाकरेंसोबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वासोबत ही चर्चा फक्त मनसेला महायुतीत घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. राज ठाकरेंना सोबत घेण्यामागे, मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय स्थितीनुसार भाजपने राज ठाकरेंसमोर ३ पर्याय ठेवल्याचे कळत आहे. त्यातला पहिला पर्याय सर्वात मोठा आहे. मनसेचे शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करुन, शिवसेनेचे नेतृत्वच राज ठाकरेंनी करावे. म्हणजेच शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंच्याच हातात दिली. आता हीच शिवसेना, राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांच्याच हाती देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र तूर्तास तात्काळ होकार देण्यास राज ठाकरेंनी नकार दिला असून सुरुवातीला इतर पर्यायांवर विचार करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही राज ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यावेळी तसे काहीही घडलेले नाही. आता पुन्हा हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. माझा वाद विठ्ठलाशी नाहीच, तर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, असे त्यावेळी राज ठाकरे म्हणाले आणि त्यानंतरच्या भाषणात तर उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना सोडल्याचे वारंवार सांगितले. सध्या उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना निसटली. शिवसेनेचे नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. आता राज ठाकरेंसमोर जो प्रस्ताव ठेवला, त्याचे उद्देश म्हणजे शिवसेना दुस-या ठाकरेंच्याच हाती जाईल.