लातूर : प्रतिनिधी
जागतिक स्तरावर ग्लोबल, वॉर्मिंग जागतिक तापमान जसे दिवसेंदिवस वाढत आहे तसेच जल संकटाचे प्रमाणही वाढत आहे. २०१६ च्या कोरड्या दुष्काळाची जाणीव आपणास सर्वांना आहे. सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न भीषण व गंभीर झाला आहे. धरणे, नद्या विहिरी, बोरचे पाणी संपत चालले आहे. गाई, गुरे, वासरे,पशुपक्षी, शेतकरी सर्व जीवसृष्टीचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून वृक्ष संवर्धन संगोपन करण्याबरोबर जमिनीची धूप थांबवली पाहिजे. पाण्याचा वापर काटकसरीने करुन, पाण्याचा आपण थेंब, थेंब वाचू या, असे आवाहन प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी केले.
येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. जल दिनाचे महत्त्व सांगताना प्राचार्य डॉ. अजय पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी भूगोल विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. यु. टी. गायकवाड हे होते. प्रारंभी प्रास्ताविक विचार प्रा. संजयादेवी पवार यांनी गोड पाणी, खारे पाणी याबरोबरच पृथ्वीवर ७१ टक्के पाणी असूनही पाण्यासाठी वन वन भटकावे लागते किंबहुना तिसरे महायुद्ध पाण्यामुळेच होईल असे म्हटले जाते, असे होऊ नये,घडू नये म्हणून आपण जलदिन केवळ साजरा करायचा नाही तर प्रत्येकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे सांगितले.
या समारंभाच्या यथोचित असा अध्यक्षीय समारोप करतांना भूगोल विभागाने वृक्षदिन, वन दिन, चिमणी दिवस व भूगोल दिनाचे आयोजन महाविद्यालयात करुन युवाक, युवतींना येणा-या भविष्यकाळात अडचणी सोडवण्याची, आपले भविष्य घडविण्याची जाणीव व्हावी म्हणून आमचे प्रयत्न आहेत असे प्रा. डॉ. उत्तम गायकवाड म्हणाले. या समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुरेखा बनकर यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. शंकरानंद येडले यांनी मांडले. या समारंभास सर्व प्राध्यापक वृंद व भूगोल विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.