हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि युवाजन श्रमिका रिथू तेलंगणा पार्टीच्या (वायएसआरटीपी) अध्यक्षा वायएस शर्मिला यांनी गुरुवारी हैदराबाद येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शर्मिला यांनी वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली आणि आपल्यावर जी काही जबाबदारी दिली जाईल ती ती पूर्ण करेन, असे त्यांनी सांगितले. तसेच शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, हा देशातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे कारण तो सर्व समुदायांची सेवा करतो आणि सर्व वर्गातील लोकांना एकत्र करण्याचे काम करतो. राहुल गांधी भारताचे पंतप्रधान व्हावे, हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते आणि आता त्या या दिशेने काम करणार आहेत, असे त्यांनी म्हटले. तसेच त्या म्हणाल्या की, मला खूप आनंद होत आहे की, वायएसआरटीपी पक्ष आजपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा भाग होणार आहे.
शर्मिला यांनी मंगळवारी सांगितले होते की, त्या आणि पक्षाचे इतर नेते दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासह शीर्ष नेतृत्वाला भेटतील आणि “महत्त्वाची” घोषणा करतील. यानंतर त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. तसेच शर्मिला यांनी तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता.

