पुणे : प्रतिनिधी
राज्यभरात सध्या उष्णतेचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे बाजारात कलिंगड, खरबूजसह पपईला मागणी वाढली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने त्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, उन्हाचा चटका वाढल्याने द्राक्षांच्या गोडीसह आवकही वाढली आहे. परिणामी, त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून दर टिकून असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
राज्यातील डाळिंबाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. सांगोला भागातून नवीन हंगामातील डाळींबाची आवक झाली. बाजारात राज्यासह परराज्यातील कर्नाटक तसेच गुजरात येथूनही डाळिंबाची आवक होत आहे.
राज्यातील डाळींबाची बांधावरून खरेदी वाढल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमीच आहे. त्यामुळे, डाळिंबाचे चढे दर कायम आहेत. याखेरीज, आंबट-गोड बोरांचा हंगाम संपल्याने त्याची आवकही रोडावल्याचे दिसून आले.

