माले : सत्तेत आल्यापासून मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू हे भारताविरोधात बोलत आहेत. पण, अचानक त्यांची भाषा मैत्रिची झाली आहे. कारणही तसेच आहे. भारताने मालदीवला कर्ज दिले आहे. या कर्जाची परतफेड करण्याची वेळ येताच मुइझ्झू गोड बोलू लागले आहेत. त्यांनी भारताचा उल्लेख जवळचा मित्र असा केला आहे. तसेच कर्जापासून दिलासा देण्याची विनंती केली आहे.
मालदीव सध्या आर्थिक संकटातून जात आहे. याआधी मालदीवने अनेक देशांकडून कर्ज घेतले आहे. विशेषत: त्याने चीन आणि भारताकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. मालदीवची आर्थिक स्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे त्याला कर्ज फेडणे जड जात आहे. म्हणूनच मुइझ्झू यांनी भारताबाबत वेगळा सूर आवळला आहे. शिवाय त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीसाठी देशाचे माजी अध्यक्ष इब्राहिम सोलाह यांना जबाबदार धरले आहे. मुइझ्झू यांनी १७ नोव्हेंबर २०२३ मध्ये अध्यक्षपदाची शपथ घेतली. सत्तेत येताच त्यांनी भारतीय सैनिकांना परत बोलावून घेण्याची औपचारिक मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर त्यांनी भारताविरोधात अनेक वक्तव्य केली. मालदीवमधील काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. मालदीव अध्यक्षांनी सर्वात प्रथम चीनचा दौरा केला होता. त्यातून त्यांचा इरादा स्पष्ट झाला होता.
मालदीवने भारताचे तब्बल ४० कोटी ९ लाख डॉलर रुपये देणे आहेत. भारताने मालदीवमधील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष इब्राहिम सोलाह हे भारत स्रेही होती. त्यांच्या काळात भारताकडून मालदीवला मदत मिळाली आहे. भारताने आता मालदीवकडे कर्जफेड करण्याची मागणी लावून धरली आहे. यावर मुइझ्झू म्हणालेत की, मालदीव भारतासोबत सहयोग करत राहिल. सध्या भारताने कर्जाबाबत दिलासा देण्याचा विचार करावा. विशेष म्हणजे मालदीवमध्ये एप्रिलमध्ये संसदीय निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुइझ्झू म्हणालेत की, मालदीवने भारताकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. येत्या काळात आपल्या क्षमतेनुसार कर्ज फेडण्याचा पर्याय शोधला जाईल. यासाठी भारत सरकारसोबत चर्चा करण्यात येईल. मुइझ्झू यांच्या विनंतीनंतर भारत सरकार काय निर्णय घेते हे पाहावे लागेल.