अमरावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर येणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारार्थ आज अमित शहांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मात्र, या सभेला आता वादाची किनार लाभली आहे. याला कारण ठरलंय ते अमरावती शहरातील सायन्सकोर मैदान. या मैदानावरूनच काल राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. अशातच आता या प्रकरणात दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत.
बच्चू कडू विनाकारण नौटंकी करतात, असा आरोप रवी राणांनी केला आहे. बच्चू कडूंना चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हा पब्लिसिटी स्टंट केला, असा टोलाही त्यांनी बच्चू कडूंना लगावला. त्यामुळे काल झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर आता राणा दाम्पत्य आणि बच्चू कडूमध्ये शाब्दिक चकमक रंगताना दिसत आहे.
बच्चू कडूंचा राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न यावर बोलताना रवी राणा यांनी म्हटले की, अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवनात शरद पवारांचा कार्यक्रम होता. ते सांस्कृतिक भवन मी बुक केलेले होते. मात्र, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे त्या ठिकाणी येत असल्याने माझे बुकिंग रद्द करण्यात आले. तसेच परतवाडा येथे देखील राहुल गांधी यांची सभा होत असल्याने ते ग्राऊंड आधीच योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी आम्ही बुक केले असले तरी राहुल गांधींच्या सभेसाठी दिले.
असे असताना देशाच्या गृहमंत्र्यांच्या सभेच्या अनुषंगाने आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्सकोर मैदान हे योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला होता. त्यामुळे बच्चू कडू हे विनाकारण नौटंकी करत आहेत. त्याचप्रमाणे ते आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आमदार रवी राणा यांनी केला.