नागपूर : जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात आज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून लोकसभा निवडणुकच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून २१ देशातील १०२ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, आज या पाच लोकसभा मतदारसंघातील विविध नेते आपल्या मतदानाचा हक्का बजवताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील आज नागपुरात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मोठ्या फरकाने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, आज आपण देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा सण साजरा करत आहोत. मतदान हा प्रत्येकाचा मुलभूत हक्क आणि कर्तव्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने मतदान करावे. गेल्या वेळी ५४ टक्के मतदान झाले होते, यावेळी मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे. तुम्ही कोणालाही मत देऊ शकता पण मतदान करणे महत्त्वाचे आहे. मला १०१% विश्वास आहे की, मोठ्या फरकाने जिंकेन. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी कोराडी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मतदान केले.