परभणी : सामाजिक प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवणारे कॉ. राजन क्षीरसागर भाकपच्या वतीने लोकसभा रिंगणात उतरले आहेत. त्यांनी कॉ. भालचंद्र कांगो, ऍड. माधुरी क्षीरसागर, लक्ष्मण काळे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला.
त्यानंतर कॉ. क्षीरसागर यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान क्षीरसागर हे सर्वसामान्य जनतेसाठी लढा देणारे नेतृत्व असल्याने सोनपेठ तालुक्यातील डिग्रस येथील नागरिकांनी वर्गणी गोळा करून क्षीरसागर यांना २५ हजार रुपयांचा धनादेश लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मदत म्हणून दिला आहे. डिग्रसच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे कॉ. क्षीरसागर यांना मदत देत एकप्रकारे आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहेत.
तसेच जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा उमेदवार असेल तर जनता अशा उमेदवाराच्या पाठीशी तन-मन-धनाने उभी राहते हे डिग्रस येथील उदाहरणातून दिसून येते.