दिलीप डासाळकर : सेलू
परभणी जिल्ह्यात सलग सहा वेळेस शिवसेनेचेच खासदार निवडून आले होते. त्यात सर्वप्रथम प्रा. अशोकराव देशमुख, सुरेशराव जाधव, तुकाराम रेंगे पाटील, गणेश राव दुधगावकर यांचा समावेश होता. गेली दोन टर्म संजय उर्फ बंडू जाधव हे शिवसेना-भाजपच्या युतीचे खासदार आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून राजकारणात उलथापालथ होत आहे.
मागील लोकसभेच्या निवडणुकीत संजय जाधव हे सामाजिक विचार केला तर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार होते. त्यामुळे संजय जाधव यांना संघाच्या विचारसरणीची मते मोठ्या प्रमाणात मिळाली होती. ती मते आज संजय जाधव यांना मिळू शकत नाहीत.आता मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाची झळ त्यांना लागू शकते. मराठवाड्यात ओबीसी समाजाची फार मोठी ताकद आहे मात्र जरांगे यांच्या मराठा आंदोलनापासून ओबीसी समाजाच्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे इतर मागासवर्ग अर्थात ओबीसी समाजातील काही मंडळी सोडली तर कुणीही बोलण्यास तयार नाही मात्र संपूर्ण ओबीसी समाज आतून एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. तसेच सामाजिक गणिताचा विचार केलाच तर परभणी जिल्ह्यात ओबीसी समाजाची जवळपास नऊ ते साडेनऊ लाख मतदार असून त्या खालोखाल मराठा समाजाची चार ते साडेचार लाख एवढी मतदार संख्या आहे. आणि या आकडेवारीचा विचार केलास तर ओबीसी असो अथवा मराठा समाजाची असो पूर्ण शंभर टक्के मतदान कुठल्याच समाजाचे होत नाही. याशिवाय मराठा समाजाची मते ही विखुरल्या जाणार असून संपूर्ण मराठा समाजाची मते संजय जाधव यांना मिळणार नसून त्यात इतरही काही अपक्ष उमेदवार आहेत. तर दलित आणि मुस्लिम या समाजाची मते देखील बीएसपी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, आलमगीर खान जे यावेळी अपक्ष आहेत त्यांनाही मताधिक्य मिळू शकते व ते मतदान बंडू जाधव यांचेच नुकसान करू शकते. त्या शिवाय यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांना मिळणारे मतदान देखील जाधव यांनाच नुकसानकारक ठरू शकते.
महायुतीचे अर्थात रासपचे उमेदवार महादेव जानकर यांचा विकासाभिमुख चेहरा समोर करून दिल्या जात आहे. महादेव जानकर हे धनगर समाजाचे असून सामाजिक गणितानुसार परभणी जिल्ह्यात धनगर समाजाची जवळपास तीन ते साडेतीन लाख मतदार आहेत. तर महादेव जानकर हे बाहेरचे उमेदवार असल्याचे चित्र उभे केलेले आहे त्यास छेद देत एक नवा विकासाभिमुख चेहरा असल्याचे प्रचारात सांगितले जात आहे.
त्यामुळे एकूणच महादेव जानकर यांना जास्तीत जास्त मते मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील असणा-यांची संख्या जास्त असून जेवढे जास्त मताधिक्य दिल्या जाईल त्यावरच विधानसभेच्या उमेदवारीचे गणित अवलंबून आहे. आणि कधी नव्हे एवढे प्रयत्न लोकसभेच्या मतदानाकरिता संपूर्ण जिल्ह्यातून करून घेतले जात आहे. आणि ही सर्व मंडळी प्रयत्नशील आहेत असे चित्र सध्या तरी दिसत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता संजय उर्फ बंडू जाधव हे यापूर्वी दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले असले तरीही हॅट्रिक करतील याची शक्यता कमी असून शिवसेनेच्या परभणी या गडाला खिंडार पडल्यामुळे महादेवजी जानकर यांचेच पारडे सध्या तरी जड दिसत आहे.