लातूर : प्रतिनिधी
लातूर पॅटर्न हा विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संस्थाचालक या सर्व घटकांनी अत्यंत परिश्रमपूर्वक घडवलेला आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणात एखाद्याने चूक केली म्हणून संपूर्ण लातूर पॅटर्नच्या लौकिकाला धक्का लागला आहे, असे समजण्याचे काही कारण नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून विषय न्यायप्रविष्ट आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांना कायद्याने कडक शिक्षा होईलच; परंतु तत्कालिक राजकीय फायद्यासाठी लातूरच्या लौकिकाला धक्का पोहोचेल अशी वक्तव्ये कोणीही करू नयेत. संकटसमयी आम्ही लातूरमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि स्थानिक व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा स्पष्ट व ठाम विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिला.
नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर ट्युशन एरियातील ट्यूशन क्लासेसच चालक, हॉस्टेलचालक, विविध व्यवसायिक विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेले भीती व संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी दि. २६ मे रोजी सायंकाळी लातूर शहरातील अष्टविनायक मंदिराशेजारील गणेश हॉल (उद्योग भवन परिसर) येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने एका व्यापक चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे मुख्य नेतृत्व माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. या वेळी त्यांनी ट्युशन क्लास, वसतिगृहे, झेरॉक्स व पुस्तक दुकाने, अभ्यासिकांचे चालक व मालक तसेच इतर संबंधित घटकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी घाबरू नये, पालकांनी निर्धास्त राहावे:
बैठकीत उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, लातूरमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत. नीटची परीक्षा रद्द झाली किंवा पुनर्परीक्षा होणार म्हणून विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. त्यांनी शांत राहून आणि पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, त्यांना नक्कीच यश मिळेल. तसेच, आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी लातूरला पाठवण्याची इच्छा बाळगून असलेल्या बाहेरील जिल्ह्यातील पालकांनीही पूर्णपणे निर्धास्त राहावे; विद्यार्थ्यांच्या भवितव्याला कोणतीही बाधा पोहोचणार नाही, याची काळजी प्रत्येक लातूरकर घेईल. लातूर हे शांत, सुरक्षित, सामाजिक एकोपा जोपासणारे आणि सकारात्मक विचारांचे शहर असून हे वैशिष्ट्य कायम जपले जाईल.
लातूरच्या ट्युशन चालक, शिक्षक व व्यावसायिकांचा यात काहीही दोष नाही खासदार डॉ. शिवाजी काळगे
लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी उपस्थित घटकांना धीर देताना सांगितले की, नीट पेपरफुटीचे प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थाचालकांनी रक्ताचे पाणी करून लातूर पॅटर्न निर्माण केला आहे. आज उद्योग भवन परिसर हा लातूरच्या अर्थव्यवस्थेचा आणि शिक्षणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. सीबीआय आणि न्यायालय दोषींना कठोर शिक्षा देईलच; परंतु यात लातूरमधील सर्वसामान्य ट्युशन चालक, विद्यार्थी आणि स्थानिक व्यावसायिकांचा काहीही दोष नाही. आम्ही येथील संपूर्ण व्यावसायिक आणि शैक्षणिक विश्वाच्या पाठीशी कायम आहोत.
लातूर पॅटर्नला बदनाम करण्यात नतद्रष्ट मंडळींचा हात: बंडापल्ले
लातूर शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी लातूर पॅटर्नची बाजू भक्कमपणे मांडली. ते म्हणाले की, आज जाणून-बुजून लातूर पॅटर्नला नतद्रष्ट मंडळी बदनाम करत आहेत. आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक लोक लातुरात येऊन स्थायिक झाले आहेत. देशात कोटा आणि लातूर ही शहरे दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. चालू नीट पेपरफुटी प्रकरणात पुणे आणि इतर जिल्ह्यातील लोकांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे, असे असताना केवळ लातूरचेच नाव जास्त करून बदनाम केले जाणे दुर्दैवी आहे.
या महत्त्वपूर्ण चिंतन बैठकीस लातूरच्या महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते विजयकुमार साबदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, अॅड. किरण जाधव, लातूर को-ऑप इस्टेटचे अध्यक्ष अशोक लोया आणि उपाध्यक्ष अभय शहा, अॅड. फारुक शेख, प्रा. राजकुमार जाधव, विकास कदम, इसरार सगरे, अशोक गोविंदपुरकर, विष्णूदास धायगुडे, व्यंकटेश पुरी, राम स्वामी, विजय जाधव, दत्ता जाधव, महादेव जाधव, नितीन पवार, विलास यादव, शार्दुल साळुंके, बालाजी पवार, सुदाम शिंदे, रघुवीर गोडभरले, संजय लड्डा, गणेश शिंदे, राजपाल भंडे आदींसह लातूर पॅटर्न कृती समितीचे विविध पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि लातूर पॅटर्नशी निगडित हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चिंतन कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक अॅड. कालिदासराव देशपांडे यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महादेव जाधव यांनी केले. बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार प्रा. विकास कदम यांनी मानले. लातूरचे शैक्षणिक वैभव आणि हित जपण्यासाठी सर्वांनी संघटित राहण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
















