इंदूर : वृत्तसंस्था
देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दूषित पाण्यामुळे १००० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास होत आहे. इंदूर शहरामध्ये नर्मदा नदीमधून येणारे पाणी हे आजार आणि मृत्यूचे कारण ठरत असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नर्मदा नदीच्या पाण्याचा वापर करू नका, असे आवाहन करणा-या पोस्ट येथील सोशल मीडियावरून लोक शेअर करत होते. मात्र लोकांच्या तक्रारींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. या दूषित पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अधिकृत आकडा ३ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नेमका किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दुषित पाण्यामुळे आतापर्यंत १,१०० हून अधिक लोकांना उलट्या-जुलाब, पोटदुखीचा त्रास होत आहे. तर १११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दूषित पाण्याचे प्राशन केल्याने तब्येत बिघडून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याने इंदूरमधील भागिरथपूरामध्ये खळबळ उडाली आहे. या भागातून सातत्याने नवनवे रुग्ण समोर येत आहेत. तसेच अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात पाठवले जात आहे.

