37.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषहोळीचे आनंदरंग

होळीचे आनंदरंग

देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो. होळीला अग्नी प्रज्ज्वलित करून नव्यानेच आलेले धान्य त्यात भाजण्याची पद्धत रूढ आहे. त्याचप्रमाणे होळीच्या दुस-या दिवशी पारंपरिक पद्धतीने विविध भागांत रंगोत्सव साजरा केला जातो. होळीच्या आगीत अनिष्ट गोष्टी जळून जातात, दु:खे नाहिशी होतात आणि रंगांमध्ये भरलेला आनंद जीवनात उतरतो, अशी होळीच्या सणाची महती आहे.

होळी हा केवळ रंगांचा सण नव्हे, तर भारताची संस्कृती आणि रीतीरिवाजाशी जोडलेला सण आहे. ग्रामीण भागात, विशेषत: उत्तर भारतातील गावांत अर्धेकच्चे धान्य आगीत भाजून खाण्याचा रिवाज आहे. त्या धान्याला ‘होला’ असे म्हटले जाते. जाणकार असे सांगतात की, नवधान्य सस्येष्टीचा हा सण आहे. या शब्दाचा अर्थ ‘नवे धान्य किंवा पिकाचे हवन’ असा आहे. वैदिक काळात याला ‘नवान्नसस्येष्टी यज्ञ’ असे म्हटले जात असे. नव्याने तयार झालेले कच्चे धान्य यज्ञात दान करून प्रसाद म्हणून ग्रहण केले जात असे. याच धान्याला ‘होला’ असे म्हटले जात असल्यामुळे या सणाला ‘होलिकोत्सव’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते. आता मात्र हा पूर्णपणे रंगांचा सण होऊन गेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर राहणारे भारतीय समूहसुद्धा या दिवशी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने होळी साजरी करतात. सर्व भेदाभेद विसरून एकत्र येतात. होलिका दहनाच्या दुस-या दिवशी होळी खेळली जाते. या दिवसाला धुळवड किंवा धूलिवंदन असे म्हणतात. यावेळी लोक एकमेकांना रंग, अबीर-गुलाल लावतात, ढोल वाजवतात आणि होळीगीते गातात. घरोघरी जाऊन एकमेकांना रंग लावला जातो. नव्या पिकाच्या आनंदाबरोबरच वसंताच्या आगमनाचेही निदर्शक म्हणजे होळी.

निसर्गही या काळात वेगवेगळ्या रंगांची उधळण करीत असतो. फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि नव्या वर्षाची, नव्या पालवीची चाहूल याच महिन्यात लागते. त्यामुळेच होळीचे एक प्रचलित नाव ‘फाल्गुनी’ हेही आहे. वसंत पंचमीपासून हा उत्सव सुरू होतो. त्या दिवशी लोक सर्वप्रथम गुलाल उधळतात. शेतातील नवीन पिकामुळे केवळ माणसेच नव्हे तर पशुपक्षीही उल्हसित झालेले असतात. फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाणारी होळी, श्रावण पौर्णिमेची श्रावणी, अश्विन शुक्ल दशमीला केली जाणारी शक्तिपूजा आणि विजयादशमीव्यतिरिक्त अश्विन अमावास्येला साजरी होणारी दिवाळी हे भारतीय समाजाचे चार महत्त्वाचे सण आहेत. इतिहास आणि संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळापासून ते साजरे केले जात आहेत. या चार सणांना अतिप्राचीन आणि प्राणवान असे म्हटले जाते. ज्यात ऊर्जा आणि संदेश आहे, असे सण म्हणजे प्राणवान होत. श्रावणीची प्रेरणा विद्या, विजयादशमीची प्रेरणा शक्ती, दीपावलीची समृद्धी आणि होळीची प्रेरणा उल्हास आणि समरसता असल्याचे म्हटले गेले आहे. राग आणि रंग यांचा या उत्सवाशी एवढा घनिष्ठ संबंध आहे की, याला आदिपर्व म्हटले जाते. आर्य या देशात बाहेरून आले, असे मानणारेसुद्धा हा सर्वांत पहिला सण असल्याचे मान्य करतात.

होळीच्या अनेक अंतर्कथा आहेत. सर्वांत प्रसिद्ध आणि जुनी कहाणी प्रल्हादाची आहे. असे म्हणतात की, अतिप्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा असुर होता. तो स्वत:ला ईश्वर मानू लागला होता. आपल्याखेरीज इतरांना ईश्वर म्हणण्यावर त्याने बंदी घातली होती. त्याचा पुत्र प्रल्हाद हा ईश्वरभक्त होता. आपला मुलगा विष्णू नावाच्या देवाची आराधना करतो, हे हिरण्यकश्यपूला समजल्यावर त्याला राग आला. विष्णूची पूजा न करण्याबाबत त्याने अनेकदा प्रल्हादाला सुनावले. परंतु प्रल्हादाने त्याचे ऐकले नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला कठोर शिक्षा देऊनसुद्धा काही उपयोग झाला नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी आपल्या बहिणीची, म्हणजे होलिकेची मदत घेतली.

होलिकेला शंकराकडून वरदान प्राप्त झाले होते. वरदान म्हणून तिला अशी चादर मिळाली होती, जी पांघरताच अग्नी संबंधित व्यक्तीला जाळू शकणार नाही. होलिकेने ती चादर पांघरून प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि आगीत जाऊन बसली. परंतु ती चादर तिच्या अंगावरून निसटून प्रल्हादाच्या अंगावर येऊन पडली आणि प्रल्हादाऐवजी होलिका जळून गेली. ईश्वरभक्त प्रल्हादाच्या स्मृतीप्रीत्यर्थ या दिवशी होळी पेटविली जाते. प्रल्हाद या शब्दाचा अर्थ संतांनी आणि साहित्यिकांनी ‘आनंद’ असा मानला आहे. छळ आणि अत्याचाराचे प्रतीक असणारी होळी जळते आणि प्रेमाचे प्रतीक असणारा प्रल्हाद म्हणजे आनंद अक्षय्य राहतो. श्रीकृष्णाने या दिवशी पुतना नामक राक्षसीचा वध केला होता, असेही मानले जाते. याच आनंदात गोप-गोपिकांनी रासलीला आणि रंग खेळला होता. होळीच्या पर्वाच्या पहिल्या दिवशी होळी पेटविली जाते. चौकाचौकात लाकडे गोळा करून होळी केली जाते. याखेरीज होळीत आणखीही काही पदार्थ जाळण्याचा प्रघात आहे. गायीच्या शेणापासून केलेल्या गोव-या यात प्रामुख्याने असतात. या गोव-यांच्या मध्यभागी छिद्र असते. त्या छिद्रांमधून दोरी ओवून माला तयार केली जाते. होळी पेटविल्यानंतर बहिणी ही माला भावांवरून ओवाळून आगीत टाकतात. भावांवर पडू शकणा-या वाईट नजरेपासून त्यांचे रक्षण व्हावे, अशी भावना यातून व्यक्त केली जाते. लाकडे आणि गोव-यांनी बनविलेल्या या होळीची दुपारपासूनच पूजा केली जाते.

सायंकाळी होळी पेटविली जाते. नव्याने आलेले पीक, विशेषत: गहू आणि हरभरा त्यात भाजला जातो. होळीचे दहन हे समाजातील सर्व वाईट वृत्तींचे दहन मानले जाते. दुस-या दिवशी गुलाल आणि रंगांच्या साह्याने होळी खेळली जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होळी खेळली जाते. ब्रजभूमीतील होळी तर जगप्रसिद्ध आहे. यावेळी पुरुष महिलांवर रंग उडवितात तर महिला लाठ्या आणि कापडाच्या साह्याने तयार केलेल्या चाबकाने पुरुषांना मारतात. मथुरा आणि वृंदावन येथे पंधरा दिवस होळीचा उत्सव रंगतो. वृंदावन येथे राहणा-या विधवा देशाच्या विविध भागांमधून आलेल्या असतात. त्या ज्या भागातून आलेल्या असतात, तिथे रूढीवादी समाजामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांत सहभागी करून घेतले जात नाही. परंतु वृंदावन येथे या विधवा महिला मंदिरांमध्ये जाऊन देवाबरोबर रंग खेळतात. होळीचा गुलाल पांढ-या वस्त्रावर पसरतो. श्रीकृष्णाबरोबर या महिला फुलांची होळी खेळतात. दक्षिण गुजरातमधील आदिवासीबहुल भागातसुद्धा होळी हाच महत्त्वाचा सण मानला जातो. छत्तीसगडमध्ये होळीला खास लोकगीते गायिली जातात. मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील भगोरिया या आदिवासी भागात तसेच बिहार- मधील फगुआमध्ये होळीचा उल्हास पाहायला मिळतो.

-सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR