जिंतूर : जिंतूरात दहावीच्या परीक्षा १ मार्च पासून सुरू होत असून या परिक्षेसाठी सुमारे ४ हजार परीक्षार्थी असून १२ केंद्रावर ही परिक्षा पारदर्शक पध्दतीने पार पडण्यासाठी ५ भरारी पथक तर १२ बैठक पथकासह पोलिस प्रशासनाचे चोख बंदोबस्त परिक्षा सर्व केंद्रांवर राहणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी दिली आहे.
तालुक्यात शिक्षणा विभागाच्या वतीने यंदा १०वीच्या परिक्षेसाठी गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा विभाग प्रमुख (पर्यवेक्षक) विलास गवई, सह पर्यवेक्षक नवनीत देशमुख यांच्या नियंत्रणाखाली परीक्षा होणार आहेत. या परीक्षेत एकुण ३९७४ परिक्षार्थी विद्यार्थी परीक्षा देणार असून १२ केंद्रावर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील २२४ शिक्षक पर्यवेक्षक राहणार आहेत. गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, मंगेश नरवाडे, डि.डि.साबळे आदींच्या नेतृत्वाखाली तीन पथके असून जिल्हा शिक्षणाधिकारी यांचे दोन भरारी पथकात महसूल, शिक्षण व इतर विभागातील अधिकारी पथकात राहणार आहे.
प्रत्येक केंद्रावर १२ बैठे पथक असून या पथकात सर्व केंद्र प्रमुख, शिक्षण विभागाचे अधिकारी असतील. प्रत्येक केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी असे २४ तर कस्टोडीयन सेन्टरवर १ पोलिस अधिकारी व १ पोलिस कर्मचारी असे एकूण २६ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई : गटशिक्षणाधिकारी पोले
सर्व विद्यार्थ्यांना १०वीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या वतीने शुभेच्छा देतो. सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून भयमुक्त परीक्षा द्यावी व घवघवीत यश संपादित करावे. या परीक्षेत कोणतेही गैर प्रकार करु नये. गैरप्रकार आढळल्यास शिक्षण विभागाच्या वतीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी असा इशारा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी दिला आहे.