लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात गेल्या सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हयाच्या भूजल पातळीत दिवसेंदिवस होताना दिसून येत आहे. वरिष्ठ भूजल विभागाच्यावतीने मार्च अखेरीस भूजल पातळीची तपासणी केली असता या तपासणीत गेल्या पाच वर्षाच्या तलुनेत लातूर जिल्हयाच्या भूजल पातळीत मार्च मध्ये २.१३ मिटरने घट झाल्याचे समोर आले आहे.
लातूर जिल्हयातील १०९ जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिण्यात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार मार्च अखेर जिल्हयातील भूजल पातळीची तपासणी लातूरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या टिमनी केली असता जिल्हयाच्या भूजल पातळीत गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत २.१३ मिटरने घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिमी पाऊस पडतो. तो गेल्यावर्षी ५४० मिमी पाऊस झाला आहे. तो सरासरीच्या ६९.१८ टक्के होता. त्यामुळे यावर्षी लातूर जिल्हयात भूजल पातळीत घसरण होताना दिसून येत आहे. मार्च मध्ये जिल्हयाच्या भूजल पातळीतही वाट झाल्याचे भूजल विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. गेल्या पाचवर्षाच्या तुलनेत यावर्षी २.१३ मिटरने लातूर जिल्हयातील भूजल पातळीत घट झाली आहे. यात लातूर तालुक्याची ०.३२ मिटरने भूजल पातळी घटली आहे. औसा तालुक्याची ३.३० मिटर, चाकूर तालुक्याची २.४१ मिटर, अहमदपूर तालुक्याची २.७४ मिटर, शिरूर अनंतपाळ ४.६० मिटर, रेणापूर तालुक्याची २.७१ मिटर, निलंगा तालुक्याची २.७६ मिटर, उदगीर तालुक्याची ०.७९ मिटर, जळकोट तालुक्याची १.७७ मिटरने भूजल पातळीत घट झाली आहे.