लंडन : इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. कुलदीप यादवच्या जाळ्यात इंग्लंडचे फलंदाज सहज अडकले. ३०० धावांचा पल्ला गाठेल असे वाटत असताना निम्मा संघ एकट्या कुलदीपने माघारी पाठवला. यासह कुलदीप यादवने एक विक्रम नोंदवला आहे.
पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर संपुष्टात आला. कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा निम्मा संघ बाद केला. १५ षटकात ७२ धावा देत ५ गडी बाद केले. यासह कुलदीप यादवने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. कसोटीत चौथ्यांदा पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला. तसेच विकेट्सचे अर्धशतकही पूर्ण केले.
कुलदीप यादवने १८७१ व्या चेंडूवर ५० वी विकेट घेतली. यापूर्वी अक्षर पटेलने २२०५ व्या चेंडूवर, तर बुमराहने २४६५ व्या चेंडूवर ५० वी विकेट घेतली होती. कुलदीप यादवने २०१७ मध्ये कसोटीत पदार्पण केले होते.
कुलदीपने कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये ५० बळी पूर्ण केले. भारतासाठी सर्वात जलद वेळेत ५० कसोटी बळी पूर्ण करणा-या गोलंदाजांमध्ये तो संयुक्त पाचवा ठरला आहे.
भारतासाठी कसोटीत सर्वात वेगवान ५० विकेट्स पूर्ण करणा-या आर. अश्विनने अवघ्या ९ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. अनिल कुंबळेने १० कसोटी सामन्यात ५० बळी घेतले आहेत. नरेंद्र हिरवानी, हरभजन सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी ११ कसोटी सामन्यांमध्ये ५० बळी पूर्ण केले आहेत.