छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे. मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते आपापसांत भिडले.
या बैठकीत कोणीही उमेदवारीसाठी आपल्याकडून नावे सुचवू नयेत असा प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता. पण यावेळी अनेकजण नावांचे प्रस्ताव मांडू लागल्यानंतर हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला गावागावांत बैठका घेऊन, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण ही बैठक आयोजित करण्यावरूनच वाद झाला. बैठक कोणी आयोजित केली यावरून उपस्थितांमध्ये वाद झाला. दरम्यान यावेळी काहींनी उमेदवारीसाठी नावं घेण्यास सुरुवात केल्यानंतर हा वाद आणखी वाढला. कोणीही उमेदवारीसाठी नावे सुचवायची नाहीत असे ठरल्यानंतरही नावे घेतल्याने शाब्दिक वाद झाला आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले.
बैठकीत उपस्थित एका कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांची सकल मराठा समाजातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोणीतरी आपल्या व्यक्तीचे नाव सुचवत होते. सर्वसमावेशक उमेदवार द्यायचा असे आमचे ठरले होते. जास्त नावे झाली तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायचे आणि ते अंतिम निर्णय घेतील असे ठरले होते. पण येथे काही नावे घेत बंधने घालण्याचा प्रयत्न झाला आणि वाद झाला.
दुस-या एका कार्यकर्त्याने हा वाद फार दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली आहे.
फोनवरून अचानकपणे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण हेतुपुरस्सर नावे घेतल्याने हा वाद झाला. पण वैचारिक लढ्याऐवजी अशाप्रकारे हाणामारी होणे दुर्दैवी आहे. बैठक दोन ते तीन दिवस आधी आयोजित करायला हवी होती. तालुक्यातील सर्व लोकांना बोलावले पाहिजे असे एकमत होते आणि यावरून वाद झाला असेही त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांचे अपक्ष उमेदवार देण्यासाठी आवाहन
मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करायचे असतील तर प्रत्येक जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार उभा करण्याचा पर्याय दिला आहे. गावोगावी सगळ्यांनी मराठा बांधवांशी बोलून मते जाणून घ्यावी आणि अंतिम निर्णय घ्यावा असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.