मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना एबी फॉर्म दिले. वर्षाताईंना खासदार करुन दिल्लीला पाठविणार आहे. देशात हुकूमशाही येऊ नये, राज्यघटना बदलू नये यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी लढतेय आणि जिंकणार आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्या कुठूनही लढू शकतात आणि जिंकू शकतात. महायुतीबरोबर आम्ही आघाडी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराचे काही सांगू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले. घोसाळकरांसह सगळे जागेवर आहेत, असंही त्यांनी म्हटले.
गेल्या १० महिन्यांपासून या मतदारसंघात राहत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नवा नाही, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुंबईतील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. २००४ ची पुनरावृत्ती होईल, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. यावर उद्धव ठाकरे यांनी वर्षाताई एक मिनिट माझे मत तुला मिळणार असे म्हटले. मी तिचा मतदार आहे, असे ठाकरे म्हणाले.