पुरंदर : बारामतीसाठी येत्या ७ मे रोजी तिस-या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून जोरादार प्रचार केला जात आहे. पुरंदरमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या अजित पवार गटाच्या प्रचारसभेत मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार व सुप्रिया सुळेंवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. तसेच, बारामतीचा विकास सुनेत्रा पवार सून म्हणून आल्यानंतरच सुरू झाला, असा दावाही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून टीका-टिप्पणी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मात्र, त्याचवेळी पुढील टप्प्यांसाठीचा प्रचार सुरू आहे. तिस-या टप्प्यासाठी येत्या ७ मे रोजी मतदान होणार असून त्यात बारामतीचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती मतदारसंघ प्रतिष्ठेचा करण्यात आला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडेंनी यावेळी सुनेत्रा पवार या पवार कुटुंबाच्या सून असल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. घरी सून आली तरी आपण तिला लेक मानतो या शिकवणीचा या निवडणुकीत विसर पडायला लागला आहे. या निवडणुकीत देशाचे भवितव्य ठरवायचे की एका परिवाराचे भवितव्य ठरवायचे हे आपल्याला नक्की करावं लागेल, असं ते म्हणाले. इतरांना अनेकदा संधी दिली आहे. एकदा सुनेत्रा ताईंना संधी देऊन बघा. २०१२ पासून १४ हजार महिलांना रोजगार पुरवला आहे. सुनेत्रा ताईंच्या विरोधातील उमेदवारानं किती लोकांना रोजगार पुरवला हे सांगावे असा प्रश्न मुंडेंनी सुप्रिया सुळेंना केला.