धरमशाला : यशस्वी जयस्वालने पाचव्या कसोटीत भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. या धडाकेबाज फटकेबाजीसह यशस्वीने आता इतिहास रचला आहे. धरमशाला कसोटीत भारताने इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांत रोखला. त्यानंतर भारताला कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी धडाक्यात सुरुवात करून दिली. त्यांनी १२४ चेंडूंत १०४ धावांची सलामी दिली.
यात यशस्वीने ५८ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ५७ धावांचे योगदान दिले. या अर्धशतकासह यशस्वी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत कमी सामन्यांत हजार धावांचा टप्पा पार करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यात त्याने मुंबईकर विनोद कांबळीला मागे टाकले. विनोद कांबळीने बारा कसोटींत हजार धावांचा टप्पा पार केला होता. यशस्वीने हा टप्पा नवव्या कसोटीतच पार केला.