मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत मोठ्या उत्साहात दाखल झाली. या यात्रेची समारोपाची सभा रविवारी मुंबईतील शिवतीर्थावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या भव्य सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार आहे. याच सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ही भव्य सभा होण्यापूर्वी उद्या राहुल गांधी यांची मुंबईत न्याय संकल्प पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही न्याय संकल्प पदयात्रा असणार आहे.
दरम्यान, सायंकाळच्या सभेला राष्ट्रीय नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी), आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडियाचे १५ हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
सभेपूर्वी उद्या राहुल गांधी यांची मुंबईत न्याय संकल्प पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ही पदयात्रा असणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मुंबईच्या मार्गावर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु होणार आहे. या पदयात्रेत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. पदयात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत.