परभणी : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी दररोज विविध पक्षांच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरताना नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी प्रत्येक पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येने ग्रामस्थांसह उपस्थित राहण्याची जबाबदारी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्यावर देत आहेत.
त्यामुळे एकीकडे लोकसभेचे वातावरण तापत असतानाच दुसरीकडे परभणी शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पाराही ४० अंशाच्या आसपास पोहोचल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातून येणा-या ग्रामस्थांसाठी वाहनाची, नाश्ता, पाणी व्यवस्थेची जबाबदारी कार्यकर्त्यांवरच सोपविण्यात येत आहे. त्यामुळे नेत्यांचे शक्तिप्रदर्शन अन् कार्यकर्ते मात्र घामाघूम होत असल्याची कुजबूज नागरिकांतून होताना दिसून येत आहे.