मुंबई : टीम इंडियाने इंग्लंड संघावर पाचव्या कसोटी सामन्यामध्ये एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर बीसीसीआयनेही आपला पिटारा उघडला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. आता कसोटी खेळणा-या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
कसोटी खेळणा-या खेळाडूंना आता सामन्याच्या मानधनाशिवाय आणखी पैसे मिळणार आहेत. जय शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कसोटी क्रिकेटकडे खेळाडू आता कानाडोळा करू लागल्याने बीसीसीआयनेही अशा प्रकारे डोकं लावलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्याचे प्रत्येक खेळाडूला १५ लाख इतके मानधन मिळते. पण आता हे पैसे तर मिळणारच आहेत. पण बोनसप्रमाणे आणखी काही एक ठराविक रक्कम खेळाडूंना मिळणार आहे.
खेळाडूंना किती पैसे मिळणार?
एका खेळाडूने एका सीझनमध्ये ७५ टक्के कसोटी सामने खेळले तर त्याला प्रत्येक सामन्याचे ४५ लाख रुपये मिळणार आहेत. ५० टक्के कसोटी खेळणा-यांना प्रति सामना ३० लाख रुपये आणि जे खेळाडू प्लेईंग ११ चा भाग नसतील त्यांना १५ कोटी एका सामन्याचे मिळणार आहेत. जर एखाद्या खेळाडूने एका सीझनमध्ये ९ कसोटी सामने असतील त्यातील चारही सामने खेळले नसतील तर त्यांना कोणतेही जास्तीचे मानधन मिळणार आहे.
दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील वार्षिक केंद्रीय करारामधून दोन खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर अशी या दोन खेळाडूंची नावे आहेत. बीसीसीआयने दणका दिल्यावर अय्यर रणजीमध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी तयार झाला. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये काही बदल होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.