नवी दिल्ली : भारत आणि चीन या देशांच्या सीमांवर मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. भारताच्या एलएसी म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने पुन्हा आपल्या सैन्याची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. भारत आपल्या चीनकडील सीमेवर १० हजार अतिरिक्त सैनिकांची गस्त वाढविणार आहे. सीमेवर आधीपासूनचे ९ हजाराहून अधिक सैनिक तैनात आहेत. त्यामुळे भारत चीन सीमेवरील भारताच्या सैनिकांची संख्या २० हजार इतकी होणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
२०२० पासून भारत आणि चीन या दोन देशांतील सीमा वाद उफाळला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये गलवान व्हॅलीत दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. त्यानंतर भारतात चीन विरोधात जनमानस संतापले होते. भारत सरकारने चीन वरुन आयात होणा-या अनेक वस्तूंवर बंदी लादत बहिष्काराचे कॅम्पेन सुरु केले होते. चीनच्या मोबाईल अॅपवर देखील बंदी घालण्यात आली. सरकारने अनेक क्षेत्रात पीएलआय स्कीम देखील सुरू केल्या आहेत. दोन्ही देशात २०२३ मध्ये ११ लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला. आता भारत आणि चीनमधील वाढत्या संघर्षाचा या व्यापारावर काय परिणाम होतोय याकडे लक्ष लागले आहे.
जेव्हा चीनी मालावर बहिष्कार
गलवान खो-यात दोन्ही देशात साल २०२० मध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर भारताने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. दिवाळी आणि होळी सारख्या सणात चीनी सामानावर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनानंतर अनेक कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या सणात देशात निर्मित वस्तू खरेदी करण्याचे आवाहन देशबांधवांना केले होते. त्यामुळे चीनी दिवे, दीपमाला यांची खरेदी घटली, आणि मेक इन इंडीया उत्पादनांना प्रोत्साहन मिळाले.
गेल्या तीन वर्षापासून चीन आणि भारतात तणाव आहे, त्यानंतरही दोन्ही देशांच्या व्यापारात कोणतीही घट झालेली नाही. २०२३ मध्ये दोन्ही देशात ११ लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. आजही भारत चीनकडून कित्येक महत्वाच्या वस्तू आयात करतो. भारत चीनकडून आजही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कार आणि मोटरसायकलचे सुटे भाग, कंप्यूटरचे पार्ट्स, कूल्ािंग सिस्टम, कार बॅटरी, मेमरी कार्ड्स, मोडम, राऊटर्स सारख्या अनेक वस्तूची आयात करतो. भारताचा चीन सोबतचा ट्रेड डेफिसिट १०० अब्ज डॉलरचा आहे. २०२३ मध्ये भारताची चीनी वस्तू आयातीत ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.
भारताचा चीन सोबतचा व्यवसाय खूप मोठा आहे. या कारण भारताला अनेक वस्तू चीनकडूनच आयात कराव्या लागत आहेत. सध्या दोन्ही देशातील वाढत्या तणावाचा या व्यापारावर मोठा परिमाण होणार आहे. भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला या वस्तूंची गरज आहे. अशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढता तणाव आणि चीनकडून सीमेवर सुरु असलेली रस्त्यांची बांधणी आदी घटनेने हा व्यापार संकटात सापडू शकतो.