नवी दिल्ली : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला गेला. यात स्मृती मंधानाच्या आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि १३६ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्ससमोर ठेवले. मात्र, मुंबईला फक्त १३० धावाच करता आल्या. यामुळे आरसीबीने हा सामना पाच धावांनी जिंकला आणि मुंबईचे अंतिम सामन्याचे स्वप्न भंगले.
महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मंधानाच्या संघाने मुंबई इंडियन्स संघाचा पाच धावांनी पराभव केला. आता अंतिम सामना १७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मेग लॅनिंगच्या संघाने गुजरातविरुद्ध विजयाची नोंद करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.एलिस पेरीच्या अर्धशतकामुळे संघाने २० षटकांत सहा गडी गमावून १३५ धावा केल्या. १३६ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. हेली मॅथ्यूज १५ धावा करून बाद झाली. त्यानंतर सातव्या षटकात पेरीने यास्तिका भाटियाला १९ धावांवर बाद केले. नेट स्कायव्हर-ब्रेंट २३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ धावांची उपयुक्त खेळी खेळली. तर अमेलिया केर २७ धावांवर नाबाद राहिली. यासह मुंबईला २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १३० धावा करता आल्या. परिणामी आरसीबीने हा सामना पाच धावांनी जिंकला.