पुणे : केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमि-यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकारी अस्वस्थ होते. त्यांची खंत ते माझ्यासमोर मांडत होते. हल्ली भाजपाला वॉशिंग मशीन म्हटले जाते, तिथे टाकले की धुवून बाहेर टाकले जाते. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपल्याला संधी मिळेल, असे अनेक नेत्याचे मत होते. अनेक वर्ष संघटनेत काम करणा-या नेत्यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय मला कळवला, तेव्हा मी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
कारण माझ्या अंदाजानुसार, मोदींचे विचार मान्य करतो म्हटल्यावर आज त्यांची फाईल टेबलवरून कपाटात गेली. पण उद्या त्यांना वाटेल तेव्हा कधीही फाईल बाहेर काढली जाईल. पण आजचे मरण उद्यावर ढकलले गेले, हे कुणाला वाटत असेल तर त्यात गैर नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवरही स्पष्ट भूमिका मांडली. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून वितुष्ट निर्माण झाले. त्यानंतर महाविकास आघाडी आकार घेत असताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अडीच दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
यानंतरही शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत घेऊन पुन्हा उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते. यामागे त्यांचा कोणता विचार होता? असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले, त्यावेळी अजित पवार यांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता, दुरुस्ती करण्याची संधी द्या, असे अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे त्यांना संधी दिली. त्यानंतर ते दोन वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते.